राज्यात पुन्हा मास्क सक्ती? लवकरच निर्णयाची शक्यता

 

देशात कोरोना संसर्गाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. दिल्लीसह कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे. आता महाराष्ट्रात देखील मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला.

मात्र राज्यात पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना विषाणूचा पुन्हा वाढता प्रभाव हा चिंतेचा विषय असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अस मत ज्येष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मास्कसक्तीसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो.

देशात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास होणाऱ्या ऑनलाईन बैठकीत मोदी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील. देशात कोरोना रुग्णांचा कमी झालेला धोका पुन्हा वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज ही बैठक घेणार आहेत.

Team Global News Marathi: