मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मनसेच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला होता. ‘राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. राज यांच्या या पत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिरकस भाष्य केलं आहे.
‘राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत मला माहिती नाही. मात्र मुख्यमंत्र्यांकडे अशी खूप पत्र येत असतात,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आता राऊत यांनी राज ठाकरे यांच्या पत्रावर केलेल्या टिपण्णीमुळे मनसे आणि शिवसेना यांच्यातील वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर प्रदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी मुंबईत सरकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. याविषयी प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत म्हणाले की, ‘याविषयी महाराष्ट्र सरकारकडून प्रतिक्रिया दिली जाईल. मात्र या देशात प्रत्येकाला कुठेही फिरण्याचं स्वातंत्र आहे. आपणही महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी तिथे कार्यालय उभारणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच केली आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.