सांगली | राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा पाचवा टप्प्यात सांगलीतील इस्लामपूर येथे पोहोचली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेन अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला.
महाराष्ट्रात जोरजोरात बोलण्याची स्पर्धा लागली आहे. भाजपची एक टीम त्यासाठी तयार झाली आहे ती फक्त शरद पवार यांच्यावर बोलण्यासाठी, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार होते त्याचं काय झालं?, असा खोचक सवाल देखील मिटकरींनी उपस्थित केला.
तुम्ही फुले, शाहू महाराजांचे नाव घेता मग फोटो कोणाचा लावता? राज ठाकरेंना फुले, शाहू, आंबेडकरांची अॅलर्जी आहे का? असा सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केला आहे. तर जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब पुरंदरेंचा खरा चेहरा समोर आणला असल्याची टीकाही मिटकरींनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे म्हणतात भोंगे लावले तर हनुमान चालिसा वाजवू. अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्यापासून सावधान राहा. भाजपवाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये, ती आम्हालाही माहिती आहे, असा घणाघात मिटकरींनी केला आहे.