राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य आहे, प्रवीण दरेकरांनी लगावला टोला |

 

मुंबई | राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद फोफावला असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. या विधानानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर दोनच शब्दात उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य आहे, असं प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रविण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपच्या यात्रांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. वातावरण भाजपमय झालेलं आहे. राज्यातील आघाडी सरकार भांबावलेलं आहे. त्यामुळे लोक नाराज आहेत. संतापलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा दरेकर यांनी केला आहे.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसऱ्यांकडे बोट दाखवताना स्वतःखाली काय जळतंय हे यांना दिसत नाही का?, असा सवाल करतानाच आघाडीचे नेते जेव्हा कार्यक्रम घेतात तेव्हा कोरोना नसतो. नेमका आमच्या वेळी कोरोना होतो का?, असा सवालही त्यांनी केला. जन आशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळत असल्यामुळे आघाडी भयभीत झाली आहे. त्यामुळे हे आरोप होत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Team Global News Marathi: