राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं उद्धव ठाकरे यांचं सूचक विधान

 

सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे.याबाबत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत शिवाजी पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.

बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मतिदिन आहे. यानिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला भेट दिली. बाळासाहेबांच्या स्मृतिला अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांवर आधारित आयोजित केलेल्या अर्कचित्र प्रदर्शनाला उपस्थिती लावली. याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

“राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाशी मी सहमत नाही. मी आजही स्पष्टपणे सांगू इच्छितो की सावरकरांबद्दल आदर, प्रेम, आपुलकी आमच्या मनात आहेच. ती कधीच पुसली जाणार नाही. पण जे लोक स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते त्यांना स्वातंत्र्यावीरांबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. स्वातंत्र्यलढ्यात तुमचे किती कार्यकर्ते होते हे आधी पाहावं मग सावरकरांवर बोलावं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“विचारधारा आणि भूमिका यावर भाजपानं आम्हाला शिकवू नये. विचार व्यक्त करायला कृती असावी लागले. कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही. पीडीपीसोबत युती केलेल्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. खरंतर देशाची वाटचाल आता पुन्हा गुलामगिरीकडे होऊ लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना टिकणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. याविरोधात लढणं आता महत्वाचं झालं आहे. कारण या लोकांना संपूर्ण देशाचा ताबा हवा आहे. त्यासमोर स्मारकाच्या ताब्याचं काय घेऊन बसलात”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: