संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विविधमुद्द्यावरून जोरदार राडा सुरू आहे. त्यातच फोन टँपिंग प्रकरण विरोधकांनी लावून धरलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पेगॅससवरून विरोधी पक्षातील खासदारांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. त्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित करण्यात येत आहे.
त्यामुळे अधिवेशनाचे अनेक बहुमूल्य तास यामुळे वाया गेले आहेत. पेगॅसस आणि कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेले विरोधी पक्ष आता वेगळाच मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिल्लीत जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
संसदेत वारंवार होत असलेल्या गोंधळामुळे कामकाज होत नाही. त्यामुळे आता विरोधकांनी संसदेबाहेर समांतर संसद चालवण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यात गेल्या महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन झालं. त्यात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या आवारातच समांतर अधिवेशन भरवलं. आता त्याच मार्गाचा वापर दिल्लीत विरोधक मोदी सरकारविरोधात करणार आहेत.