राज्यातील कठोर निर्बंधांमुळे जनमानसात अस्वस्थता; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरातील रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. अशावेळी राज्य मंत्रिमंडळाने राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांबाबत छोटे व्यावसायिक आणि अन्य क्षेत्रातून विरोध होताना दिसतोय. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय.

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, असं ट्वीट फडणवीसांनी केलंय.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावाले लागतील, असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊनसदृश्य निर्बंध घालण्यात आलेत. त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन त्याचा विरोध करत आहेत.

हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर वाहतूक खुली ठेवण्यात गॅरेज आणि स्पेअर पार्ट्स दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहे. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत.

त्यामुळे माझी विनंती आहे की, पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करुन त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरीबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीनं नव्याने निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ या संदर्भात पाऊले उचलाल, असा विश्वास वाटतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: