कुणाचीही रोजीरोटी हिरावून घ्यायची नाही; लॉकडाऊन गर्दीटाळण्यासाठी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका

कुणाचीही रोजीरोटी हिरावून घ्यायची नाही; लॉकडाऊन गर्दीटाळण्यासाठी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका

 

ग्लोबल न्यूज: कोरोनाची लाट थोपविण्यासाठीच लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधांचे पाऊल उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात किंवा कुणाचीही रोजीरोटी हिरावून घ्यायची नाही, तर गर्दी टाळण्यासाठी असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरुद्धच्या या लढय़ात व्यापाऱयांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले.

हा लढा सरकारशी नाही तर विषाणूशी आहे हे समजून घ्या. नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापारी-व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये हीच सरकारची भावना आहे. व्यापाऱयांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास त्यांच्या मागण्या, सूचनांचाही गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

No one wants to be deprived of their livelihood; To avoid lockdown crowds! Clear role of Chief Minister Uddhav Thackeray

व्यापारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद

राज्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतर काही ठिकाणी व्यापाऱयांकडून आंदोलने करण्यात आली. त्याचप्रमाणे व्यापारी संघटनांकडूनही सरकारकडे निर्बंध शिथिल करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आताची परिस्थिती फार विचित्र आहे. कोरोनाचे हे संकट दुर्दैवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

कुणाच्याही रोजीरोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकडय़ांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती, पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये बेड्सची संख्या सात-आठ हजार होती. ही संख्या आता पण पावणेचार लाखांपर्यंत वाढवली आहे. जम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केल्या नसतील अशा सुविधा निर्माण केल्या, पण या सुविधाही अपुऱया पडण्याची वेळ येईल अशी स्थिती येण्याची शक्यता आहे.

कामगार, कर्मचाऱयांना तुमच्या कुटुंबातील समजून जबाबदारी घ्या

व्यापारी व व्यावसायिकांच्या सूचनांचा स्वीकार केला तर त्यांनीही कामगार-कर्मचाऱयांना आपल्या कुटुंबातील समजून त्यांच्या कोविड चाचण्या करायला हव्यात, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायला हवी, त्यांच्या येण्या-जाण्याची काळजी घ्यायला हवी. यात एकमेकाची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. नक्कीच या संकटातून बाहेर पडू. पण गेल्या वेळी जी चूक केली ती पुन्हा करू नका. कोरोना पूर्ण जात नाही तोपर्यंत शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या.

लसींचा साठा संपतोय

लसीकरण सुरू झाले, पण लसींचा साठाही आता संपून जाणार आहे. कारण आपण लसीकरणाची गती मोठय़ा प्रमाणात वाढवली आहे. नव्या लाटेत आता तरुण वर्ग यामध्ये मोठय़ा प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामासाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या 70 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे. 25 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती, पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरून आता 45 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे, पण लसीचा साठा संपू लागला आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकार सोबत; व्यापाऱयांचे आश्वासन

त्याचप्रमाणे व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी वीरेन शहा, बी. सी. भरतीया, जितेंद्र शहा, विनेश मेहता, ललित गांधी, मोहन गुरनानी यांनी म्हणणे मांडले. या सर्वांनी व्यापाऱयांचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या हातात हात घालून काम करू. आताच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी. व्यापाऱयांचे काम चालू राहील आणि विषाणू संक्रमण रोखण्यासाठीचे नियमांचेही काटेकोर पालन होईल, अशा उपाययोजना करण्याची मागणी करतानाच ‘ब्रेक दि चेन’ला सहकार्य करू असे सांगितले. यावेळी दीपेन अग्रवाल, जयकृष्ण पाठक, रसेश दोशी, महेश बखाई, निमित शहा, मितेश मोदी, धीरज कोठारी, राजेश शहा, राजेंद्र बठिया, धैर्यशील पाटील, दिलीप कुंभोजकर, संतोष मंडलेचा, वालचंद संचेती आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱहाड, राज्य टास्क पर्ह्सचे डॉ. शशांक जोशी आदी सहभागी झाले होते.

दुकाने बंद करण्यामागे गर्दी टाळणे हाच हेतू

व्यापाऱयांनीच दिलेल्या माहितीनुसार मुंबईतच कामगारांची संख्या लाखोंची आहे. या कामगारांच्या प्रवास, येण्या-जाण्यामुळे -संपर्कामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. दुर्दैवाने कोरोनाचा पहिला घाला मुंबईवर झाला. आता दुसरा हल्ला आपल्यावरही झाला आहे. बाहेरच्या राज्यातून आणि परदेशातून येणे-जाणेही मुंबईत मोठय़ा प्रमाणत आहे. त्यामुळे मुंबईची सुरक्षा नीट ठेवली तर राज्याची आणि देशाची सुरक्षा नीट राहील. त्यासाठी यापूर्वीच खासगी कार्यालयांना कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे, वेगवेगळ्या शिफ्ट करण्याचे आवाहन केले होते. खरेतर दुकाने चोवीस तास उघडी ठेवा असे आवाहनही केले होते. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही हेतू दुकाने बंद करणे हा नाही. तर गर्दी टाळणे हा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी पत्रकारांकडून जनजागृती महत्त्वाची

राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामुळे पत्रकारांनी या उपाययोजनांबाबत सरकारला सूचना कराव्यात. त्याचप्रमाणे नियमावलीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. या साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना केले. यावेळी पत्रकारांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या दुसऱया टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना कोरोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे किती आवश्यक आहे याबाबत जनजागृती करावी.

तुम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या.

नवा स्ट्रेन तरुण आणि मुलांसाठी घातक

कोरोना संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेहून अधिक धोकादायक ठरत असल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची दुसरी लाट लहान मुले, तरुण आणि गर्भवती महिला यांच्यासाठी अधिक धोकायदायक ठरत आहे.यापूर्वी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये वयोवृद्ध रुग्णांची संख्या अधिक होती. परंतु, आता मात्र लहान मुले, तरुण आणि गर्भवती महिला यांची संख्या अधिक आढळत असून, हा चिंतेचा विषय आहे, असे दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: