‘नकट्या नटीला संरक्षण’ पण, कश्मिरात तिरंगा फडकवू शकत नाही – सामनामधून टीका
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला आणि कंगना रानौत हिला दिलेल्या ‘वाय’ दर्जाच्या सुरक्षावरून पुन्हा एकदा टोला लागवण्यात आला आहे. कश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तेथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरला. मग ३७० कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रीयत्वाशी येतो.
आज एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे याचा सरळसोट अर्थ असा की, त्या भूमीचे आम्ही स्वामी नाही! त्या भूमीवर दुसऱ्याच कुणाचा तरी हुकूम चालत आहे. अशी टोलेबाजी आजच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे.
तर, मुंबईत आजही तिरंगा फडकतोय. म्हणजे हा भाग पाकड्यांचा नाही. जेथे पाकड्यांची मिजास चालते तेथेच तिरंग्याचा अपमान होतो. नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी व मर्दानी तेथेच आहे! अशा शब्दांत पुन्हा एकदा सामनातून अभिनेत्री कंगना राणावरवर निशाणा साधला आहे.
कश्मीरात नक्की काय सुरू आहे याबाबत शंकाकुशंकांना खतपाणी मिळणाऱया घटना, घडामोडी रोज घडताना दिसत आहेत. कश्मीरबाबत देशवासीयांच्या भावना तीव्र आहेत. काँग्रेसच्या काळात कश्मीर हातातून गेलेच होते ते भाजपने परत मिळवले हे जे सांगितले जाते ते खरे असेल तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास विरोध का करण्यात आला? याचे उत्तर देशाला मिळायला हवे. कश्मीर हा हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग आहे हे सिद्ध करण्यासाठीच मोदी सरकारने ३७० कलम हटवून कश्मीरच्या पायांतील गुलामीच्या बेड्या तोडून फेकल्या. त्याबद्दल सगळ्यांनीच कौतुकाचा वर्षाव केला. ३७० कलम हटवून भारतमातेचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. हे सर्व मोदी व शहा यांचे राज्य दिल्लीत असल्यामुळेच घडले, पण ३७० कलम हटवूनही भाजप कार्यकर्त्यांना चारेक दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही.
लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना कश्मीरच्या पोलिसांनी रोखले व बंदी बनवले. हे चित्र काय सांगते? म्हणजेच कश्मीरची स्थिती अजूनही सुधारलेली नाही. जे बरे दिसत आहे तो फक्त वरवरचा मेकअप आहे. आता कश्मीरातील तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत व त्यांनी ३७० कलम पुन्हा आणण्यासाठी लढा उभारण्याचे ठरवले आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला या बेडकाने तर ‘डराव डराव’ करत असे जाहीर केले की, ३७० कलम पुन्हा आणण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ. हा सरळसरळ राष्ट्रद्रोहच आहे. दुसरी ती बेडकीण मेहबुबा मुफ्ती. तिने तर ‘कश्मीरात तिरंगा कसा फडकतो ते पाहू’ असे आव्हान दिले आहे. या दोन्ही नेत्यांची भाषा फुटीरतेची आणि चिथावणीची आहे.
तिरंग्याचा अवमान हिंदुस्थान कधीच सहन करणार नाही. ही देशभावना आहे. गेल्या ५ ऑगस्टला घटनेतील ३७० कलम काढून फेकून देण्यात आले. तोपर्यंत जम्मू-कश्मीरला वेगळे निशाण व वेगळे संविधान होते आणि हा प्रकार भारतमातेच्या काळजात सुरी खुपसल्याप्रमाणे वेदना देत होता. या दोन तरतुदींमुळे जम्मू-कश्मीर हे हिंदुस्थानच्या नकाशावर असूनही हिंदुस्थानच्या पोटातील स्वतंत्र राष्ट्र म्हणून डरकाळ्या फोडीत होते. मोदी-शहा यांनी हे स्वतंत्र राष्ट्र बरखास्त केले हे खरे. पण आजही कश्मीरात तिरंगा फडकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर कसे व्हायचे? ३७० कलम हटविल्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे व लोकांवर बंधने आहेत असे आजच्या सामना अग्रलेखात म्हंटले आहे.