राज्यात आलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात आता वीज कंपनी जबरदस्तीने सक्तवसुलीने वीजबिल वसूल करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. ते आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
जनतेला आलेली भरमसाठ वीजबिलं ही ट्रायच्या प्रस्तावावर विचार न करता, सुनावणी न घेता राज्यमंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आहे. या निर्णयामुळे आज सर्वसामान्य ग्राहकांना दुप्पट वीजबिल भरावं लागत आहे. त्याला सरकारच जबाबदार आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
यावेळी ‘खोटारडा मंत्री’ म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांच्यावरजोरदार निशाणा साधला होता, सध्या सरकारच्या ऊर्जा खात्याने जी वाढीव वीजबिलं दिली आहेत. ती विजेच्या अधिक वापरामुळे आली आहेत की खुद्द राज्य सरकारने केलेल्या दरवाढीमुळे आहेत, याची कुठल्याही मंत्र्याबरोबर आणि कुठल्याही मैदानावर खुली चर्चा करण्यास आपण तयार असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.