‘पोटदुखी, जळजळ होणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील

 

मुंबई | आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. आजची मुंबईतली सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे. मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने या सभेचे आयोजन केलं आहे.

तसेच महाराष्ट्राचा देशाचा राजकीय वातावरण आणि या वातावरणावरती आलेलं मळभ, दुःख, गढूळपणा हा आजच्या सभेने दूर होईल. महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य दिसेल. पोटदुखी, जळजळ असणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं की, आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशा प्रकारची ही सभा असणार आहे, असं ते म्हणाले. हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे.

मात्र काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे. त्यावर मला असं वाटतं आजच्या सभेने योग्य उपचार केले जातील, असं संजय राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: