मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत असून राज्याच्या चिंतेत अधिक वाढ होताना दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरात विशेष करून मुंबईत कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यातच देशात ओमायक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाचं संकट वाढत असल्यानं अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, हरियाणा मध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेज, सलून, उद्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही ५० टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत.एकप्रकारे जवळजवळ बंगालमध्ये मिनी लॉकडाउन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील मिनी लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती विदारक बनत चालली आहे. राज्यात रुग्ण संख्येबरोबरच आतापर्यंत सरकारमध्ये असणारे आणि जनतेच प्रतिनिधित्व करणारे १३ मंत्री आणि ७० आमदार कोरोना बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार आता मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत अशी माहिती मिळत आहे.राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा अभ्यासानुसार आता निर्बंध कडक करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रशासनाला वाटत आहे . त्यामुळे राज्यात विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन कारण्याविषयी सरकार प्रशासन विचार करत आहे.तर इतर दिवशी नवे निर्बंध लागू करण्याचा तयारीत सरकार आहे अशी माहिती एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली आहे.