मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही त्यावर बोलणं बंद केलं आहे. ज्याला जे करायचं आहे, त्याने ते करावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. नुकतंच कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. कंगनाच्या वांद्र्यातील कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. साधारण 40 मिनिटे दोघांची चर्चा झाली. त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत हे एएनआय या वृत्तसंस्थे शी बोलत होते.“ज्या अभिनेत्रीचं तुम्ही नाव घेत आहात, तो विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही त्यावर बोलणं बंद केलं आहे ज्याला जे करायचं आहे, त्याने ते करावं. आम्ही बोलणार नाही. पण आम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवू. जे कोणी मुंबई- महाराष्ट्रात येतात त्यातील कोणालाही आम्ही बाहेर जायला सांगितले नाही. फक्त मुंबई-महाराष्ट्राला आपले म्हणा. ही आमची भूमिका आहे. ज्या पोलिसांना माफिया म्हणता त्यांचे संरक्षण घेता,” अशा टोला संजय राऊतांनी कंगनाला लगावला.
“कारण इतिहासाचे पानं नेहमी बदलत असतात, नवीन इतिहास लिहिला जातो, पण जुन्या इतिहासाची पानं फाडली जात नाहीत. त्यामुळे जे होत आहे आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत आणि पाहात आहोत की कुठला पक्ष महाराष्ट्र आणि देशाबद्दल काय विचार करतो. त्यांचे विचार किती वाईट आहेत आणि फक्त इतक्यासाठी कारण तुमची सत्ता गेली. त्यामुळे तुम्ही हा तमाशा करत आहात. तुम्ही एका राज्याच्या संस्कारांना बदनाम करत आहात, तुम्ही संयम ठेवायला हवा होता, राजकारणात असे चढउतार येत असतात, सत्ता येते सत्ता जाते, लोकशा्हीत बहुमत चंचल असतं, जर तुम्हाला हे कळत नाही तर तुम्हाला राजकारण करण्याचा अधिकार नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
“राजकारणात हे पहिल्यांदा झालेलं नाही. सत्ता येते सत्ता जाते, सरकार बनतं सरकार जातं, पण राज्य आणि देशाची जनता नेहमी असते, त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचं असतं. ज्याप्रकारचं वातावरण महाराष्ट्रात काही लोकांनी तयार केलं आहे, मला असं वाटतं की ते समाजासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी चांगलं नाही,” असेही राऊतांनी सांगितले.
“प्रश्न कुणीही विचारु शकतात, ते मर्चंट नेवीचे अधिकारी आहेत. राजनाथ सिंह जे देशाचे संरक्षण मंत्री आहेत. तेही यात अतिशय इंटरेस्ट घेत आहेत. जर कुठल्या शहरात किंवा राज्यात कोणी नागरिक राहातो. तर त्या नागरिकाचं एक कर्तव्य असतं की जो राज्याचा प्रमुख आहे, त्याच्याबद्दल आदर ठेवाव आणि बोलावं. जर तुम्ही यापद्धतीने बोलाल, बदनामी कराल, चिखल उडवाल आणि त्यानंतर लोकांच्या मनात जर राग येतो, तर तुम्ही सरकारला का दोष देता,” असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला.
“त्यामध्ये सरकारचा काय दोष, शिवसेनेने जर हल्ला कोला आहे, तर तो आम्हाला विचारुन तर नाही केला, इतका मोठा महाराष्ट्र आहे , हे कोणाहीसोबत होऊ शकतं, आमच्यासोबतही होऊ शकतं याचा संबंध सरकारशी जोडणं, सरकारशी जोडतो.” असे संजय राऊत म्हणाले.
लष्कराचा आदर आम्ही करत राहू. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही नेहमी लष्कराचा आदर करु, त्याचा अर्थ हा नाही की कोणीही यावं आणि चिखलफेक करावी, आदर हा दोन्ही बाजूने असतो. तुम्ही काहीही कराल आणि लोक शांत राहातील? असे संजय राऊत म्हणाले.
“मी मानतो की राज्य आणि देशाच्या कुठल्याही निरपराध व्यक्तीवर अशाप्रकारचा हल्ला व्हायला नको. उद्धव ठाकरे सरकारही हे मानतं. सर्वांना शांततेत जगण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही वातावरण खराब करत आहात आणि तुमच्या पाठीशी कोण आहे हे सर्वांना माहित आहे. तुम्ही आधी स्वत:च्या आत बघा की तुम्ही कोणती चूक केली आहे. माझी संवेदना आहे त्या व्यक्तीसोबत ज्याच्यावर हल्ला झाला. मी त्याचा कठोर विरोध करतो, महाराष्ट्रात कायद्याचं सरकार आहे, कायज्याचं राज आहे, त्यामुळे तात्काळ हल्ला करणाऱ्यांना पकडलं आहे. न्यायालयासमोर हजर केलं आहे,” असेही राऊतांनी सांगितले.
“कायदेव्यवस्था मेटेंन करण्याचा अर्थ काय, जेव्हा कोणी कुठला गुन्हा करतं तेव्हा तात्काळ त्या गुन्हेगाराला पडकणे, गुन्ह्यांना थांबवणे हेही कायद्याचं काम आहे, पण संपूर्ण देशात हिच कायदेव्यवस्था आहे, आम्ही तात्काळ कारवाई केली, त्या लोकांना पकडलं तेव्हा ते कुठल्या पक्षाचे आहेत हे पाहिलं नाही, कायद्याचा सन्मान करणे हे महाराष्ट्रात नेहमी होते,” असेही संजय राऊत म्हणाले.
https://twitter.com/ANI/status/1305114387301138432?s=19