राज्यपाल भगत सिंह कोश्यारी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

ग्लोबल न्यूज: विधानपरिषदेतील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीला होत असलेल्या विलंबामुळे आता राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.

अधिवक्ते राज पाटील यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. १२ राज्यपाल नियुक्ती विधान परिषद आमदार च्या नियुक्तीला होत असलेला विलंब, भारतीय संविधानानुसार उमेदवारांची पात्रता आदी विषय याचिकेत नमूद करण्यात आले आहेत. तसेच विधानपरिषदेतील आमदारांची निवड ही संवैधानिक पात्रतेनुसार नव्हे तर राजकीय आधारावर केली जाते, यावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे १२ सदस्यांची यादी देऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यानंतर कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना अधूनमधून याची आठवण करुन देत असतात.

ग्लोबल न्युज नेटवर्क: