उत्तरप्रदेश | केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत. मात्र दुसरीकडे हे कायदये मागे घेण्याच्या मनस्थितीत केंद्र सरकार दिसून येत नाहीये. त्यातच आता उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथे शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारादरम्यान पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
दोन लोकांचा मृत्यू गाडीने उडवल्यामुळे तर तीन लोकांचा मृत्यू गाडी उलटल्यामुळे झाला असल्याचं लखीमपूरचे जिल्हाधिकारी डॉ. अरविंद चौरसिया यांनी बीबीसीचे प्रतिनिधी समीरात्मज मिश्र यांच्याशी बोलताना सांगितलं. गेल्या वर्षी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून हजारो शेतकरी काळे झेंडे घेऊन तिकुनिया जिल्ह्यातील लखीमपूर खिरी इथे जमले होते.
जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे या भागात आले होते. अजय मिश्रा यांच्या टेनी गावातील कार्यक्रमासाठी त्यांना जायचं होतं.केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या गाड्यांचा ताफा आंदोलनस्थळी आला. ताफ्यातील काही गाड्या आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर घालण्यात आल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. यामध्ये एकूण ५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत.