शेतकरी आंदोलनावरून पवारांचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल 

मुंबई: ‘नवी दिल्लीच्या सीमावर्ती भागात आज शेतकऱ्यांना थंडीत ६० दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित होती.  विद्यमान सरकार त्यातून काही शिकतील अशी अपेक्षा  मी अण्णासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने करतो’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला आहे.

देशाच्या कृषी क्षेत्रात प्रचंड योगदान देणाऱ्या आणि सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण वर्षांत विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. या संकल्पनेची शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी पवार बोलत होते.

‘केंद्रात अनेक वर्षे शेती विभागाचे राज्यमंत्री म्हणून अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाचा आणि दूरदृष्टीचा परिचय दिला. संशोधनावर त्यांनी अधिक लक्ष दिले आणि  या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना त्यात सहभागी करून घेतलं.

देशामध्ये हरितक्रांती आणण्यात ज्या लोकांचं योगदान होत त्यात बाबू जगजीवनराम, सी. सुब्रमण्यम यांच्या जोडीने अण्णासाहेब शिंदेंचा महत्त्वाचा वाटा आहे. हरितक्रांती प्रत्यक्षात आणण्याच्या उपक्रमात अखंडता आणि सातत्य अण्णासाहेबांमुळेच शक्य झाल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अण्णासाहेब शिंदे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. यशवंतराव चव्हाणांना अण्णासाहेबांबद्दल आस्था होती. त्यांनी अण्णासाहेबांना १९६२ साली नगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि विजयी झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंना आग्रहाने सांगून कृषी खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सुपूर्द केली, असेही पवार यांनी नमूद केले.

अण्णासाहेब शिंदे आणि चव्हाण प्रतिष्ठानचा घनिष्ठ संबंध आहे. संस्थापकांच्या यादीमध्ये  त्यांचं नाव बघायला मिळेल. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष म्हणून काहीकाळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि विविध प्रकारच्या बैठकांना नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केलं, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: