केरळमध्ये मान्सून दाखल होतात आता महाराष्ट्रातही कोकण आणि अन्य भागात मान्सूनचे आगमन होत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सूनदरम्यान नैसर्गिक दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढतेय. मात्र या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी वेळीत मदत आणि बचावकार्य सुरु पोहचवण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबईत मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली.
या बैठकीत यंदा पावसाळ्यात संभाव्य आपत्ती निवारण्यासाठी एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्वी तैनात करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य आपत्ती व्यवस्थापनेने केली आहे. त्यामुळे राज्या मान्सूनदरम्यानच्या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आता एनडीआरएफच्या टीमला वेळेत पोहचण्यास मदत होईल. ठाणे, मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम 15 जूनपासून तैनात केली जाणार आहे. याचप्रकारे राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एनडीआरएफची एक तुकडी नांदेड आणि एक तुकडी गडचिरोली येथे 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका गेल्या काही वर्षांपासून वाढत असल्याने या घटनांच्या ठिकाणी ऐनवेळी मदत व बचावकार्य पोहचवण्यात उशीर होऊ नये म्हणून यंदा प्रथमच पावसाळ्यापूर्वीच एनडीआरएफच्या 9 तुकड्या राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच पावसाळ्यात धरणांतील पाण्याच्या विसर्गाचा प्रश्न दरवर्षी महत्वाचा मुद्दा असतो. अनेकदा धर फूटून किंवा धरणातील पाणी एकाचवेळी सोडल्याने आपत्तीजन्य घटना घडतात. त्यामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी पूर नियंत्रण नियोजनाने व्यवस्थितरित्या करू शकतात, त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवर राहावे तसेच मुख्य अभियंत्याच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे निर्देश आजच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.