पाटील, सत्तार यांना उद्धव ठाकरेंच्या सुसंस्कृतपणाचा धाक होता, आता मात्र..!

 

राज्यातील मंत्री महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यावरून या नेत्यांवर टीकेची झोड उठली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनीही सुषमा अंधारे यांच्यावर असभ्य भाषेत विधान केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

मुंबई येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आकसाने कारवाई केली जात आहे. पण, सत्ताधारी पक्षातल्या लोकांवर कारवाई केली जात नाही. आमचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींविरोधात जिथे कारवाई होते, तिथे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहतो. आमचे पदाधिकारी मडवींनाही जाणीवपूर्वक तडीपार केलं आहे. त्याला विरोध म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढला. मात्र, त्यानंतरही आमच्या लोकांविरोधात गुन्हे दाखल झाले’, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या नेत्यांविरोधात टीका करताना जाधव म्हणाले की, आपण अडीच-तीन वर्ष भाजप नेते, सहयोगी सदस्य कशी वक्तव्य करत आहेत हे जरा तपासून पाहायला हवं. भाजपाच्या अनेक नेत्यांनी केलेली वक्तव्य अत्यंत अश्लाघ्य आणि निषेधार्ह आहेत. त्यात भाजपच्या बाजूला शिंदेंचा गट जाऊन बसला आहे.

आधी गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या सुसंस्कृतपणाचा धाक होता. तो आता राहिलेला नाही. भाजप कधीकधी आपले विचार दुसऱ्याच्या तोंडून वदवून घ्यायचा प्रयत्न करत असते. म्हणून गुण नाही, पण वाण लागला आहे. शब्द जरी त्यांचे असले, तरी भाजपचेच शब्दप्रयोग ते करत आहेत, अशी टीका जाधव यांनी केली आहे.

Team Global News Marathi: