मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. या आरोपावरून आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा विरोधकांनी जोरदार प्रयत्न सुरु केला आहे.
त्यात आता आघाडी सरकारने सुद्धा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. असे मलिक यांनी बोलून दाखविले होते.
पुढे बोलताना मलिक म्हणाले की, महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ते दिल्लीत कोणा-कोणाला भेटले होते याची माहिती आमच्याकडे आहे. लवकरच सत्य सर्वांसमोर येईल असं सूचक वक्तव्य मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.