महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याएवजी केंद्रातील सरकार बरखास्त करा – संजय राऊत

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. त्यात भारतीय जनता पक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीने राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती.

आता विरोधकांच्या या मागणीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. परमबीर सिंह यांच्यावर एकेकाळी शंका उपस्थित करणारे आज त्यांचा वापर करुन तोफा उडवत आहेत. विरोधकांचे परमबीर सिंह हे महत्वाचे शस्त्र आहे. आमच्यात केंद्रीय तपास यंत्रणांविषयी दुमत नाही. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात घुसत असून हा महाराष्ट्रावर घाला आहे असा राऊत यांनी बोलून दाखविले.

दरम्यान राष्ट्रपती लागू करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाश आंबेडकर हे नातू आहेत. बाबासाहेब घटनाकार आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात किती श्रद्धा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

मात्र महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, असे प्रकाश आंबेडकर सांगत असतील, तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण ज्या प्रकारे खोटी-नाटी प्रकरणे निर्माण करून विरोधी पक्ष राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणत आहे किंवा एक केस बनवत आहे. यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही किंबहुना केंद्रातील मोदी सरकार बरखास्त केले पाहिजे. कारण हा राज्याच्या स्वायत्तेवर घाला असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: