पंढरपुरात माघी वारीत उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने १३७ भाविकांना विषबाधा

 

माघी यात्रेच्या सोहळ्यात भाविकांनी एकादशी दिवशी भगर अन् आमटी खाल्ली. त्यामुळे त्यांना विषबाधा झाली झाल्याची माहिती समोर आली आहे. बाधित झालेल्या १३७ जणांना आज पहाटे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माघी वारीच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी मागील २५ वर्षांपासून मनाठा ते पंढरपूर अशी दिंडी काढली जाते. या दिंडीत भाविक नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील लोक १८५ च्या आसपास पायी चालत येतात.

मोठ्या संख्यने भाविक यंदाही माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी दिंडी ३१ जानेवारी रोजी पंढरपुरात आली. त्यांनी पंढरपुरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये मुक्काम केला. त्या भाविकांनी एकादशीच्या उपवासामुळे बुधवारी भगर अन् आमटी खाल्ली. परंतु त्यांना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मळमळ, उलट्या व चक्करचा त्रास सुरू झाला. सदर बाधित झालेल्या १३७ जणांना गुरुवारी पहाटे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आहे.

ही माहिती मिळताच अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंढरपूर शहरातील मर्दा या दुकानातून जेवण बनविण्याचे साहित्य आणले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अन्न औषध प्रशासनाने विषबाधा झालेल्या अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय १३७ भाविक उपचार घेत आहेत. सर्व भाविकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश कुमार माने यांनी दिली.

Team Global News Marathi: