२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक घटना घडली. ऐतिहासिकच म्हणावे लागेल कारण माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळा आजच्याच झाला होता. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राज भवनात हा शपथविधी पार पडला होता.
आता पुन्हा एकदा या शपथविधीची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन करण्यात आले आहे. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी भाष्य केले आहे, यावरून आता पुन्हा एकदा या घटनेवर शरद पवारांकडून खुलासा करण्यात आला आहे,
या पुस्तकात म्हंटले आहे की,’सरकार स्थापनेची चर्चा सुरु असताना काँग्रेससोबत चर्चा फार निखळ स्वरुपाची होत नव्हती. काँग्रेस नेत्यांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे चर्चेत रोज अडचणी येत होत्या. आम्ही अतिशय सामंजस्य पद्धतीने काँग्रेसला समजून घेत होतो. परंतु त्यांचा प्रतिसाद काहीसा अडेलतट्टू होता., असंही या पुस्तकात लिहिले आहे.
या पुस्तकात त्यांनी पुढे नमूद केले आहे की,’ घटनेनंतर मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,’ असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं’ असा खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे.