मुंबई : कोरोनाच्या संसर्गात प्रेताचे खच पडताना दिसत आहे. आजण वाढत असलेली रुग्णसंख्या त्याचबरोबर वाढत असलेले मृत्यूचे प्रमाण देशभरातील परिस्थिती अतिशय भयावह करत आहे, अशा या सध्याच्या कठीण परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारण बाजूला सारून काम केलं तरच हा देश वाचेल. अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालय सक्रिय झालं आहे. ही चांगली गोष्ट आहे. हे थोडं आधी व्हायला पाहिजे होतं. आज अनेक राज्यांची परिस्थिती हातबाहेर गेली आहे. महाराष्ट्र लढतोय, झगडतोय, संघर्ष करतोय, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना आखल्या आहेत. महाराष्ट्राला सुद्धा ज्याप्रमाणात लसींचा पुरवठा व्हायला पाहिजे पात्र ते केंद्राच्या आडमुठेपणामुळे होत नाही असं विधान त्यांनी यावेळी केले होते.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फक्त फटकारून काय साध्य होणार? राष्ट्रीय आपत्ती असूनही केंद्र सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसेल तर हे केंद्र सरकारचं नियंत्रण सुटल्याचं द्योतक आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन करायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार या राष्ट्रीय समितीच्या माध्यमातून कोरोना परिस्थिती हाताळतील. जेणेकरून कुठल्याही राज्यावर अन्याय होणार नाही असेही राऊत म्हणाले.