कामगारांनी राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनू नका, संजय राऊत यांचं आवाहन !

 

नवी दिल्ली | एसटी कामगारांच्या आंदोलनात भाजपने सहभाग घेऊन थेट या आंदोलनाला भडकवण्याचा प्रयत्न केला आहे तर याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना राजकारण न करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत विरोधकांना टोला लगावला आहे त्याचप्रमाणे एसटी कामगारांना मोलाचा सल्ला दिला आहे. भाजपला महाराष्ट्राच्या स्थिरतेला आणि शांततेला चूड लावायची आहे. त्यांना राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या आहेत. त्यामुळे एसटी कामगारांनी भाजपच्या हातचे बाहुले बनू नका, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं.

संजय राऊत यांनी एसटी कामगारांच्या आंदोलनावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या बऱ्याचश्या मागण्या मान्य केल्या आहेत. कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनू नये. त्यांनी स्वत:चं, कुटुंबाचं, एसटीचं आणि महाराष्ट्राचं हित पाहावं, असं आवाहन हे मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आजचे मुख्यमंत्री हे विश्वास ठेवावेत असे आहेत. त्यामुळे कामगारांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन राऊत यांनी केलं.

तसेच अनिल परब यांचे पुतळे जाळण्यात येत आहेत. त्यामागे राजकारण आहे. पुतळे जाळण्याचं राजकारण सुरू आहे. ते कोण आहेत? त्यांचा राजकीय अजेंडा काय आहे? त्यांना कामगारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सरकारला बदनाम करण्यात रस आहे. कामगारांच्या चुली पेटाव्यात असं त्यांना वाटत नाही. एसटी विलीनकरण करावे अशी त्यांची मागणी आहे. पण एसटीचं विलीनिकरण होणं अजिबात शक्य नाही असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवारच म्हणाले. त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अर्धवट नाही. पूर्ण आहे. पण त्यांची भूमिका तीच आहे. आता मात्र, भाजपमधील हौशेगवशे, उपरे नाचत आहेत. त्यांच्या नाचण्याने प्रश्न सुटत असतील तर सुटावेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

Team Global News Marathi: