सोलापूर | माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधान मोदींच जबाबदार आहेत. मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात. फक्त मतदानाच्या वेळी समोर येतात आणि मतदान मागतात, त्यांना लाजही वाटत नाही अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
पुढे बोलताना शिंदे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांचं भूत सध्या वोटिंग मशीनमध्ये जाऊ बसलं आहे. हाताला मतदान केलं तर ते भाजपला जातं. त्यामुळे आधी शिक्का मारुन केलं जाणारं मतदानंच योग्य होतं. बॅलेट पेपर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. त्याचबरोबर मतदान प्रक्रियेत बदल करण्याचे संकेतही दिले आहेत.
उजनी धरणाच्या ५ टीएमसी पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला होता. उजनीतील ५ टीएमसी पाणी इंदापुराला घेऊन जाऊ दिले जाणार नाही. ‘प्राण जाये, पर पाणी न जाये’, अशी भूमिका आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती.