महाराष्ट्रावर पावसाचं संकट, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने जारी केला अलर्ट

 

मुंबई | राज्यावरील अस्मानी संकट संपलेलं नसून हवामान विभागाने एक अलर्ट जारी करत मुंबईत बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. मुंबईसोबतच पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांनाही सतर्क करण्यात आले असून ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे.


अंदमानच्या समुद्रात पुढील १२ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून त्यातून बंगालच्या खाडीत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे वादळ त्यापुढील एक दोन दिवसांत आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांच्या किनारी धडकू शकतं, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने महाराष्ट्र व गुजरातला सतर्क केलं आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून जवळ अरबी समुद्रात पुढील २४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून त्याचा परिणाम म्हणून अनेक भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकण भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून त्यात मुंबई , पालघर आणि ठाणे या पट्ट्यात सर्वाधिक पाऊस कोसळू शकतो, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.

Team Global News Marathi: