अनिल परब यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मनसेने केली मागणी

 

एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होताना दिसत आहेत. तुटपुंज्या वेतनामध्ये घर चालवने कठीण झाले आहे. मात्र आता ते वेतनही वेळेवर मिळत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच अनेक कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्या केल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. एकूणच सरकार विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.

आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये मनसेने देखील उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय बिटक असून, अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याला जबाबदार परिवहन मंत्री अनिल परब हेच असल्याचा आरोप मनसे नेत दिलीप धोत्रे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत संपूर्ण वाहतुक व्यवस्था ठप्प असल्याने, त्याचा सर्वाधिक फटाक हा एसटीला बसला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देखील रखडले होते. अनेक महिने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा देण्यात आलेला नव्हता.

कोरोना काळात सर्व कामे ठप्प असताना देखील अनेक कर्मचाऱ्यांच्या अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी कर्तव्यावर बोलवण्यात आले होते. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव देखील गमवावा लागला. मात्र तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याची सरकारने दखल न घेतल्याने एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत.

Team Global News Marathi: