भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणात आपले मत मांडताना सांगितले की महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने आपल्या कामगिरीने हे सिद्ध केले आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचे पूर्णपणे गुन्हेगारीकरण झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा शंभर कोटींची वसुली करण्यास सांगितले होते. पोलिसांकडून जबरदस्तीने वसुली करून घेणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.
पाटील यांनी जाहीर केले की जर गृहमंत्र्यांनी आज रात्री राजीनामा दिला नाही अथवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी केली नाही तर उद्या रविवारी भाजपा कार्यकर्ते संपूर्ण राज्यभर आंदोलन करतील आणि सरकारला गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडतील. हे आंदोलन अनिल देशमुख यांची हकालपट्टी करेपर्यंत चालूच राहील.
पाटील यांनी पुढे सांगितले की आता केवळ अनिल देशमुख यांनी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सरकारला राजीनामा द्यायला हवा. अनिल देशमुख यांची 100 कोटींची गोष्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शरद पवार सर्वांना ठाऊक होती परंतु सर्व गप्प होते !
पाटील यांनी या प्रकरणात महा विकास आघाडी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून सांगितले की महाराष्ट्राची अशी बदनामी करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीएक अधिकार नाही. जर या सरकारमध्ये थोडी जरी लाज बाकी असेल तर संपूर्ण सरकारला राजीनामा देऊन साडेअकरा कोटी जनतेची माफी मागायला हवी.
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत, ते अतिशय धक्कादायक आणि निंदनीय आहे. आता हे स्पष्ट आहे की ठाकरे सरकार भ्रष्ट आहे ! त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावे ! @AnilDeshmukhNCP @OfficeofUT pic.twitter.com/QD011hqmvM
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 20, 2021