मुंबई : सध्या संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात झालेली आहे. तसेच १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरवात होणार आहे. मात्र आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीच्या साठयावरून इतक्याच १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात येणार नसल्याचे विधान केले होते. मात्र आता लवकरच मे महिन्याच्या १५ तारखेनंतर लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री टोपे यांनी केली आहे.
राज्यात १८ वर्षांच्यावरील नागरिकांच्या लसीकरणाला १५ मे नंतर सुरुवात केली जाईल. अशी माहिती गुरुवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त व राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणची माहिती जाणून घेतली. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधत १५ मे नंतर लसीकरणाला सुरुवात होईल, असं सांगितले आहे.
दरम्यान केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार भारत बायोटेक आणि सीरमने राज्य सरकारला लस देण्याचा दर हा कमी करण्याची घोषणा केली आहे. भारत बायोटेकने २०० रुपये तर सीरमने १०० रुपये लसीचा दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोलून दाखवले आहे.