नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर मोदी सरकारकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. मात्र सध्या अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे.त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे.
प्रियंका गांधी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. ‘लसीवर आता फक्त मोदींचा फोटो आहे. पण सर्व जबाबदारी मात्र राज्यांवर देण्यात आली. आता राज्याचे मुख्यमंत्री लसींच्या तुटवड्यावर केंद्र सरकारला सूचना देत आहेत. देशभरात लसीचा तुटवडा जाणवत आहे, याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहे.
कोरोना संसर्गाच्या सुरवातीला भारतात सामान्यांचे जीव वाचवण्यासाठी लसीचा शस्त्र म्हणून उपयोग करायला पाहिजे होता. मात्र त्याचा वैयक्तीक प्रचारासाठी वापर केला गेला. लसीकरणाच्या स्तरावर जागातील कमकुवत देशांच्या यादी भारताचा समावेश झाला आहे. हेच आजचे कटू सत्य आहे. असं का झालं?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी यांनी थेट पंतप्रधान मोदींना विचारला आहे.
प्रियंका गांधी यांनी 3 प्रश्न अधोरेखित केले आहेत –
सरकारने गेल्या 1 वर्षांपासून लसीकरणाचं नियोजन केलं होतं. मग जानेवारी 2021 मध्ये 1 कोटी 60 लाख लसींच्या डोसची ऑर्डर का दिली गेली ? तसेच सरकारने भारतीय नागरिकांना कमी लस देऊन, लसीचे अधिक डोस हे विदेशात का पाठवले? आणि भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. पण आज दुसऱ्यांच्या देशांकडून लस मागण्याची वेळ का आली? आणि तेही मोठी कामगिरी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न का केला जात आहे? असे प्रश्न उपस्थित केले आहे.