मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळेना, अतिवृष्टीने शेती पिकेना; युवकाने संपवले जीवन

मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळेना, अतिवृष्टीने शेती पिकेना; युवकाने संपवले जीवन

: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. आरक्षणासाठी अनेकांनी आपले प्राण देखील दिले. विधिमंडळात बहुमताने मराठा आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, नुकतेच सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्दबातल ठरवल्यामुळे मराठा तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे.

शेतकरी कुटुंबातील मराठा युवकाने याच नैराश्यातून जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. यानंतर समाजाकडून तीव्र भावना व्यक्त केली जात आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील येणोरा येथील २२ वर्षीय युवक सदाशिव शिवाजी भुंबर याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

इलेक्ट्रिशिअनचा कोर्स करून सदाशिव हा पुण्यातील एका कंपनीमध्ये नोकरी करत होता. परंतु कमी पगारात पुणे शहरात राहणे शक्य नसल्याने तो परत आला होता. सदाशिवच्या वडिलांना चार एकर शेती आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पिकंही करपून गेली. त्यामुळे एका बाजूला नोकरी नाही तर दुसरीकडे  शेतीचं नुकसान झाल्यानं त्याचे कुटुंब आर्थिक संकटात सापडला होते. त्यामुळे हवालदिल झालेल्या सदाशिवनं घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

शिक्षण घेऊन देखील आरक्षण नसल्याने शासकीय नौकरी मिळत नाही. पुणे सारख्या ठिकाणी २ वर्ष जॉब केला, परंतु परवडत नसल्याने गावी आलो. गावाकडे पण ओला दुष्काळ असल्याने शेताकडे लक्ष लागत नाही. आई वडिलांनी मला खूप शिकवले मोठे केल. मी त्यांचा ऋणी आहे. व्यवसाय करण्याची देखील इच्छा होती, मात्र पैसा नसल्याने करता येत नाही. या सर्व परिस्थितीमुळे निराश आल्याने आत्महत्या करत आहे. असं सदाशिवने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: