केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक आणि सूटका या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले होते. तसेच या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप शिरु केले होते. त्यातच सामना अग्रलेखातून सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भरसंसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा, अशी मागणी केल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, चांगली गोष्ट आहे, लवकर तपास करावा. संजय राऊत येवढा उशीर का लावतात हे आम्हालाच कळलेलं नाही. २०१४ पासून शिवसेना सत्तेत आहे. २०१४ ते १९ दीपक केसरकर गृहमंत्री होते. आता पण शिवसेना सत्तेत आहे. संजय राऊत ज्यांची चमचेगिरी करतात, त्या पवार साहेबांकडे गृहखातं आहे. त्यामुळे मला कळत नाही की ते सामना मधून असं का आव्हान देत आहेत. त्यांच्याकडे राज्याची सत्ता आहे. त्यांनी तपास करावा. मला हरकत नाही, असं नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे म्हणाले की, त्याचबरोबर मला संजय राऊतांना ही विनंती करायची आहे, तुम्ही या सर्व केसेस उघडत असताना जरा नंदकिशोर चतुर्वेदी हे गेल्या 4 महिन्यापासून का गायब आहेत, याची पण चौकशी झाली पाहिजे. राज्यात काही लोक गायब होत आहेत. त्यामध्ये नंदकिशोर चतुर्वेदी आहेत. ते कोणाचे पार्टनर आहेत. २०१९ मध्ये आताच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील कुठल्या मंत्र्यांचे पार्टनर होते. या सर्वांची चौकशी संजय राऊत यांनी केली तर त्याही कुटुंबाला थोडा आधार भेटेल, असं नितेश राणे म्हणाले.