कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. दीड महिन्यात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. पुढील पंधरा दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येवर राज्य सरकारचे लक्ष राहील. आता पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी कोविड टास्क पर्ह्स समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले.
गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरिएंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे यावर लक्ष ठेवा, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली. 16 एप्रिल 2022 रोजी राज्यात सर्वात कमी 626 सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या 4 हजार 500 वर गेली आहे असे सांगून डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत.