निकालानंतर शिवसेनेची मोदींवर स्तुतीसुमने; मात्र दुसरीकडे काँग्रेसने दर्शवली नाराजी

 

मुंबई |पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होम ग्राऊंड आणि भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य गुजरातवरील पकड भाजपने गुरुवारच्या निकालात अधिक मजबूत केली.काँग्रेसकडून महत्त्वाच्या जागा हिसकावून घेतल्या. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुखरामसिंह राठवा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल (बोस्की) असे दिग्गज चारीमुंड्या चित झाले.

उत्तर गुजरातमध्येही गेल्या वेळेपेक्षा मोठे यश भाजपने संपादन केले. एकूणच गुजरातमध्ये भाजपने काँग्रेसचा १४९ जागांवरील विजयाचा रेकॉर्ड तोडत विजयाचा नवा इतिहास रचला. अर्थात, देशभरातून भाजपचे या विजयाबद्दल अभिनंदन होत आहे. शिवसेनेनंही भाजपचे अभिनंदन केलं आहे. मात्र, दिल्ली अन् हिमाचल प्रदेशच्या पराभवावरही चर्चा व्हायला हवी, असेही म्हटलंय.

गुजरात निवडणुकीबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अभिनंदन करतो, गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासीक आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच अभिनंदन केलं होत. त्यानंतर, आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. मात्र, भाजपच्या सत्ता मिळण्यासाठी कायपण असलेल्या राजकारणालाही लक्ष्य केलं आहे.

मोदी यांच्यामुळे गुजरात प्रगतीपथावर वेगाने पुढे जात आहे. अनेक जगतिक दर्जाचे सोहळे गुजरातमध्ये होत आहेत व जागतिक नेते साबरमती, अहमदाबादेत उतरतात ते मोदींमुळेच. महाराष्ट्रासारख्या राज्यातील अनेक मोठे उद्योग गुजरातेत याच काळात पळवून नेले गेले. त्याचाही फायदा निवडणुकीत झालाच आहे. गुजरातमध्ये गांधी पिंवा सरदार पटेल यांचे भव्य पुतळे उभारले आहेत. पण मोदी हीच गुजरातची ओळख व अस्मिता आहे.

गुजरातच्या मतदारांनी ते दाखवून दिले. ‘आप’ व केजरीवाल यांनी गुजरातेत येऊन फक्त हवा केली. गुजरातेत पुढचे सरकार आमचेच अशी बतावणी केली. त्यांच्या सभांना गर्दी झाली. पण ‘आप’ने काँग्रेसची मते खाल्ली. मतविभागणी घडवून एक प्रकारे भाजपचा विजय सहज केला. अर्थात ‘आप’ नसती तरी भाजपच जिंकणार होता. पण, काँग्रेसची स्थिती कदाचित इतकी बिघडली नसती.

गुजरातमध्ये आप व ‘एमआयएम’ने भाजपचा पराभव करण्यापेक्षा काँग्रेसचे नुकसान केले हेसुद्धा नाकारता येणार नाही. सगळय़ांनाच भाजपचा पराभव करायचा होता, पण एकमेकांच्या पायात पाय अडकवून त्यांनी भाजपच्या विजयाचाच मार्ग मोकळा केला. अर्थात, भाजपने गुजरात जिंकले तरी राजधानी दिल्लीतील महानगरपालिका व हिमाचल प्रदेश हातचे गमावले आहे. गुजरातचे निकाल भाजपसाठी जितके ऐतिहासिक तितकेच दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या नाकासमोर झालेला भाजपचा पराभव ऐतिहासिकच म्हणावा लागेल. दिल्ली महानगरपालिकेत भाजपची 15 वर्षे सत्ता होती. ती उलथवून टाकण्यात ‘आप’ला यश आले. दिल्ली ही देशाची राजधानी आहे व पंतप्रधान मोदींचे राजकारणाचे पेंद्रस्थान आहे. येथे मोदींची जादू का चालू शकली नाही? गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती.

Team Global News Marathi: