अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का?

 

लखीमपूर खेरीत घडलेल्या अमानवीय हत्याकांडामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याच मुद्द्यावरून शिसवीणेचे मुखपत्र आसलेल्या सामना अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका करण्यात आलेली आहे. सर्व सरकारी संपत्ती खासगी लोकांना विकून टाकल्यावर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे. त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा ठाकला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे ऐकायला हवे. प्रियंका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे, असं म्हणत शिवसेनेने सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.

नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांडय़ा उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?, असा संतप्त सवाल शिवेसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रियंका गांधी यांना योगी सरकारने अखेर अटक केली आहे. मागील 36 तासांपासून त्यांना सीतापूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ज्या घाणेरडय़ा जागेत प्रियंका गांधी यांना नजरकैद करून ठेवले होते त्या जागेत प्रियंकांना स्वतः साफसफाई करावी लागत होती. हातात झाडू घेऊन कचरा काढणाऱ्या प्रियंकांचा एक व्हिडीओ जगभरात व्हायरल झाल्याने आपल्या देशाची छिःथू होत आहे. प्रियंका गांधी या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर राजकीय हल्ले होऊ शकतात, पण देशासाठी असीम त्याग करणाऱ्या व पाकिस्तानचे तुकडे करून हिंदुस्थानच्या फाळणीचा सूड घेणाऱ्या महान इंदिरा गांधींच्या त्या ‘नात’ आहेत, यांचे तरी भान प्रियंकांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते.
कैदखान्यातून प्रियंका गांधींनी मोदी सरकारला जळजळीत प्रश्न विचारला आहे, ”माझा अपराध काय? कोणत्याही वॉरंटशिवाय, एफआयआरशिवाय मला डांबून का ठेवले? शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे काय?”

उत्तर प्रदेशातील शेतकरी हत्याकांडाचे पडसाद जगभर उमटले आहेत. सरकारने कोणाचेही, कसेही मुडदे पाडायचे व विरोधकांनी त्यावर आवाज उठवला तर त्यांचे गळे आवळायचे. ज्यांना मारले त्यांच्या नातेवाईकांनी अश्रू ढाळले, हुंदके दिले, तर त्या नातेवाईकांवरही उद्या सरकार उलथविण्याचे कट रचले म्हणून खटले दाखल केले जातील. लखीमपूर खेरीत केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवले. त्या मंत्रीपुत्रास वाचवण्याचे प्रयत्न योगींच्या पोलिसांनी केले. ”तो मी नव्हेच, मी तेथे नव्हतोच,” असा आव मंत्रीपुत्राने आणला. पण आता शेतकऱ्यांवर घुसवलेल्या गाडीचा व्हिडीओच समोर आला. त्यामुळे सरकार काय करणार? हे असे प्रकरण प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने देशभर आंदोलन पुकारले असते.

Team Global News Marathi: