मुंबईतील कथित क्रुझ ड्रग्स प्रकरणावर कारवाई केल्यानंतर अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आलेली आहे. काल बुधवारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानला अटक करताना भाजपचे के.पी.गोसावी आणि मनीष भानुशाली उपस्थित होते. तसेच त्यांचे फोटो सर्वत्र प्रसारित झालेले आहेत. एनसीबीचे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे काय संबंध आहेत? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.
मलिक यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या सवालावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. अन्याय झालेल्या करूणा शर्मा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला निघाल्या तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून फसवले. भाजपा नेते किरीट सोमय्या भ्रष्टाचाराची तक्रार करायला निघाले तर त्यांना खोट्या नोटीसा बजावत पोलिसांनी त्यांना रोखलं, असा प्रतिआरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे.
स्वत:चा जीव धोक्यात घालून ड्रग्स बाबत माहिती देत पोलिसांना कायदेशीर मदत, धाडसी पंच म्हणून काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्ते मनिष भानुशालीच्या नावाने थयथयाट करत आहेत. ज्यांच्याकडे गृहविभाग आहे त्या राष्ट्रवादीचे हे पहा असे नवाब म्हणत चोर मचाये शोर, असं म्हणत आशिष शेलारांनी ट्विटरच्या माध्यमातून मलिकांवर टीका केली आहे.