खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठणाच्या स्टण्टवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. भाजपने हिंदुत्वाची नौटंकी केली आहे. खासदार नवनीत राणा हे याच नौटंकीमधील एक पात्र आहेत. पण त्यांना मुंबईचं पाणी अजून माहिती नाही. शिवसैनिक त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ आहेत, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते शुक्रवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नवनीत राणा यांनी २३ एप्रिलला मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मात्र, नवनीत राणा या केवळ स्टंटबाजी करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ती सिनेमातील लोक आहेत, त्यांना स्टंटचा अनुभव आहे. मात्र, त्यांच्या स्टंटबाजीने कोणताही फरक पडणार नाही. त्यांना अजून मुंबईचं पाणी माहिती नाही. त्यांना काय करायचे आहे ते करु द्या. राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसैनिक सक्षम असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी भाजपचा समाचार घेतला होता. हनुमान चालीसा वाचणे हा श्रद्धेचा विषय आहे, नौटंकी किंवा स्टंटचा नव्हे. पण भाजपने हिंदुत्वाची नौटंकी करून ठेवली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा ही याच नौटंकीमधील पात्र आहेत. परंतु, भाजपच्या हिंदुत्वाच्या नौटंकीला जनता गांभीर्याने घेत नाही. हनुमान जयंती आणि रामनवमी हे सण आम्ही तुमच्यापेक्षा मोठ्याप्रमाणात मुंबईत साजरे करतो. त्यामुळे भाजपने आम्हाला शिकवू नये. त्यांना जे काही स्टंट असतील ते करू द्या, असेही संजय राऊत यांनी म्हटले.