युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून विरोधकांनी टीका करणं सुरू केलं असलं तरी आमदार रोहित पवारांनी मात्र आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. निमंत्रण आल्यास मी सुद्धा त्यांच्यासोबत आयोध्या दौऱ्यावर जाईल असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट केलं जात असून हे आम्हाला नाही तर राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केलं जातं असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केला. लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून मुंबई महापालिकेची निवडणूक आयोग डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
ते जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असता बोलत होते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आता भाजपची भाषा बोलू लागल्या आहेत. त्यांचं पद टिकवण्यासाठी आणि पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना तिकीट हवं असेल म्हणून त्यांनी भूमिका बदलली असावी. शिवाय निवडून येण्यासाठी भाजप काहीही करायला बसलं, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.