“राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीच्या अध्यक्षावर बलात्काराचा आरोप होऊन देखील अजूनही अटक झालेली नाही”

 

कोल्हापूर | मुंबईत साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात पोलिसांचा आणि कायद्याचा धाक का निर्माण होत नाही याचा महाराष्ट्र विकास आघाडी शासनाने विचार केला पाहिजे असे सांगितले. राज्यात गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ अशा घटना घडल्या असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख ठेऊन गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करावा, अशी मागणीही पाटील यांनी केली.

 

ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, साकीनाका येथे घडलेली घटना भीषण आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. गुन्हेगारांची झटपट जामीनावर सुटका होत आहे. त्यानंतर वर्षानुवर्षे असे खटले चालू राहतात. त्यामुळे या खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करायला हवी.

त्यांनी सांगितले की, राज्यात महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते वेगवेगळ्या अपराधाच्या घटनांमध्ये सापडत आहेत पण कारवाई होत नाही. पोलीसांवर दबाव आणला जातो. त्यामुळे गुन्ह्यातील प्रमुख आरोपीला अटक होत नाही तसेच कमी प्रभावाची कलमे लावली जातात. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीच्या अध्यक्षावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला पण अजूनही अटक झालेली नाही.

Team Global News Marathi: