सचिन वाझे कोणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे, नारायण राणे यांचा सवाल

अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी तसेच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे आणि शिवसेना संबंधावर भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांनी अनेकवेळा भाष्य केले होते. आता पुन्हा एकदा राणे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.

राणे या संदर्भात बोलताना म्हणतात की “मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेबद्दल असं काय प्रेम आहे? मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेंच्या पार्श्वभूमीची माहिती कशी नाही? सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?”, असा सवाल राणे यांनी उपस्थि केला होता.

पुढे बोलताना राणे म्हणतात की, राज्यात गेल्या सव्वा वर्षापासून राजकीय धुळवड सुरू आहे. सामनाच्या लेखातून संजय राऊतांनी पहिल्यांदाच सरकारच्या चुका दाखवून दिल्या आहेत. सचिन वाझेला वाढवलं, त्याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागत आहेत. संजय राऊतांचा लेख म्हणजे लेकी बोले, सुने लागे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चुका नाव न घेता दाखवून दिल्या आहेत”, असं राणे म्हणाले आहेत.

तसेच “परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या का? सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या केल्यानंतर देखील त्याला अटक करू देत नव्हते. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याबद्दल असं काय प्रेम आहे? मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेच्या बॅकग्राऊंडचीही माहिती कशी नाही? सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?”

Team Global News Marathi: