मुंबई : कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प हा राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊन देऊ नका, असे पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवले होते.
याच संदर्भात आता शरद पवारांनी राज ठाकरे यांना दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याची माहिती राज ठाकरे यांनी सोमवारी कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना ही माहिती दिली.
मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे आता नाणार प्रकल्पाविषयीच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने बंद केलेल्या या प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.