पंजाब | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेल्या भेटीमुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. अलिकडेच अमरिंदर सिंग यांनी काॅंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना पक्षबरोबर झालेली युती आणि RSS च्या तंबूतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झालेले नाना पटोले यांचा संदर्भ घेत टोला लगावला होता. महाराष्ट्रात शिवसेनेशी झालेली युती आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासारखे भाजपमधून काॅंग्रेसमध्ये आलेले सेक्युलरिझमवर बोलणारं कुणीही नाही. त्यामुळे सेक्युलरिझमवर बोलणं सोडून द्या रावतजी. तसेच नाना पटोले आणि रेवंथ रेड्डी हे स्वयंसेवक संघातून काॅंग्रेसमध्ये आले आहेत, असं बोलून अमरिंदर सिंग यांनी पंजाब काॅंग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांच्यावर हल्ला चढवला.
अमरिंदर सिंग यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे अमरिंदर सिंग हे भाजपचा मुखवटा बनत आहेत. काॅंग्रेस पक्षाने त्यांचा अपमान नाही तर सन्मानच केला आहे. असं हरीश रावत म्हणाले होते. मात्र काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या पंजाब विधसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.