काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२४ साली नरेंद्र मोदी यांच्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस सरकार सत्तेवर येईल, असा दावा केला. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडताना दिसून येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पटोलेंवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव होईल आणि राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचं सरकार स्थापन होईल’, असे नाना पटोले म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या निर्विवाद यशामुळे नानांचा आत्मविश्वास दुणावलेला असावा. ‘ तसेच नाना पटोले आप आगे बढो चमचे आपके साथ है, असे भातखळकर म्हणाले आहेत.
नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरूनही केंद्रावर निशाणा साधला असून आज पुन्हा पेट्रोल ३० पैसे, तर डिझेल ३५ पैशांनी वाढले. गेल्या ७ दिवसात इंधनाचे दर ४ रूपयांनी वाढले. निवडणूक असती तर मोदी सरकारने अशी दरवाढ होऊ दिली नसती. भाजपला केवळ सत्ता हवी आहे. जनतेशी देणेघेणे नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.