मुंबई : तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता ,अविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक सुरु झालेली आहे. त्यात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये आहेत होते. त्यांच्या या दौऱ्यावरून काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही टीका केली आहे. महाराष्ट्रालाही तौक्ते वादळाचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबाबतचा हा भेदभाव नाही का?, असा सवाल मलिक यांनी केला आहे.
यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा, गुजरातला जात आहेत. त्यांना तिकडे जायला वेळ आहे. पण महाराष्ट्रात येत नाहीत, अशी टीका करतानाच नियम शिथील करून कोकण किनारपट्टीवरील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रातही वादळ आलं आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रातही आलं पाहिजे, असं ते म्हणाले.