मुंबई | भाजपने अंधेरी पूर्वची पोटनिवडणूकीतून माघार घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र यावरून शिंदे गट-भाजपा आणि ठाकरे गटात अजूनही शाब्दिक चकमक सुरूच असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपा-शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
“सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना, याची खात्री करुन पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले! अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ!”, असे ट्वीट करत आशिष शेलार यांनी सामनातील टीकेला प्रत्त्युतर दिले आहे.
“भाजपाने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या ३९७ जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर एक आहोत, हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिले. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो. नाही तर पेग्विन सेना..घरात बसून “गणपत वाण्या” सारखी नुसतीच स्वप्न बघणार”, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.