कोल्हापूर | कोहापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादीचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगें यांच्यात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच पुन्हा एकदा घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली आहे.
नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वत:चा उदोउदो सुरू केला.मात्र गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीस पडलेले नाही, त्यांना व्याज भरावे लागले त्याचे काय करणार? मुश्रीफसाहेब याला तुम्ही मर्दपणा म्हणता का? यासाठी वाघाचे काळीज लागते का, असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केला.
समरजित घाटगे म्हणाले, आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर २०२० मध्ये, ‘ शेतकऱ्यासाठी असे पॅकेज देऊ की त्यांचे डोळे पांढरे होतील’ असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. त्यांची भविष्यवाणी ५० टक्के खरे ठरली. त्या पॅकेजची वाट पाहून शेतकऱ्यांचे डोळे मात्र पांढरे झाले.
स्वत:ला शेतकऱ्याचा मुलगा म्हणता मग एकाच योजनेची तीन तीन वेळा घोषणा कशी करता? योजनेची घोषणा होईल, त्या प्रत्येक वेळी स्वत:चा उदोउदो करुन घ्यायचा. हे पैसे तुमच्यामुळे नव्हे तर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळेच मिळत आहेत. गेली दोन वर्षे शेतकऱ्यांना गाजर दाखवून वंचित ठेवले आहे, त्यांच्या व्याजाचे काय करणार? पैसे द्यायचे नाही आणि स्वत:चा उदोउदो करायचा, मुश्रीफसाहेब यालाच मर्दपणा म्हणायाचा का? यासाठीच वाघाचे काळीज लागते का, असा सवाल घाटगे यांनी केला.