उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारामुळे सध्या देशात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला असून अनेक ठिकाणी उद्रेक पहायला मिळत आहे. विरोधकांकडून याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक केल्याची मागणी केली जात असताना अजय मिश्रा मात्र आपला मुलगा त्यात सहभागी नव्हता असं सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजपा खासदार वरून गांधी यांनी पक्षालाच खडेबोल सुनावले आहे.
लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक ट्विट केली आहेत. यासदंर्भात त्यांनी योगी सरकारला पत्रही लिहिलं आहे. तसंच पीडित कुटुंबांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणीसुद्धा वरुण गांधी यांनी केली आहे. दरम्यान, गुरुवारी वरुण गांधी यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
वरुण गांधींनी लखीमपूर घटनेचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, हा व्हिडिओ स्पष्ट आहे. आंदोलकांची हत्या करून त्यांना गप्प बसवलं जाऊ शकत नाही. निष्पाप शेतकऱ्यांचे जे रक्त वाहिले आहे त्याला जबाबदार कोण? पीडितांना न्याय मिळायला हवा. शेतकऱ्यांमध्ये असा संदेश जायला नको की आपण क्रूर आहे. तसेच पोलिसांनी गाडी मालक आणि हे कृत्य करणाऱ्यांना तात्काळ अटक कारवी अशी मागणी केली आहे