मुंबईच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी महानगर पालिकेकडून २१ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनही मुंबईच्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावी अशी मागणी भाजपचे आमदार अमीत साटम यांनी केली आहे. साटम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुंबईच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस उपाय करण्याची मागणी केली आहे.
मुंबईच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी २४ वर्षांत २१ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खर्च करूनही मुंबईच्या रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याची बाब आमदार अमीत साटम यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. नियोजन, दूरदृष्टी आणि विकासाचा विचार यांचा अभाव असल्यामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे मत अमीत साटम यांनी व्यक्त केले.
प्रत्येक रस्त्यासाठी छोट्या निविदांऐवजी पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे आणि शहरासाठी प्रत्येकी एक अशा तीन निविदा काढून दर्जेदार रस्ते तयार करून घ्यावेत, अशी मागणी अमीत साटम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रस्त्यांच्या निविदेतच युटिलिटी कॉरिडॉरची तरतूद करावी. पाणी, गॅस, वीज, इंटरनेट या युटिलिटींसाठी नियोजन करावे, अशीही मागणी अमीत साटम यांनी केली आहे.