मुंबई | मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक वेळेवर होणार की पुढे जाणार अशी चर्चा होताना दिसून येत होती अशातच आता मुंबई पालिका निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं मुंबई महापालिकेच्या निवडणुका मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणे किंवा कार्यकाल वाढवून देण्याची शक्यता कमी झाली आहे.
मुंबई महापालिकेचा कार्यकाल हा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपत आहे. त्याआधी निवडणूक जाहीर झाली तर आचारसंहितेमुळे सर्व कामकाज प्रशासनाच्या हातात जाईल. त्यामुळे या प्रशासक आणि महापालिकेचा कालावधी वाढवणं याची गरज राहाणार नाही. मुंबई महापालिका २०२२ निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा तयार राज्य निवडणूक आयोगाचं पालिका आयुक्तांना पत्र पाठवण्यात आलं आहे.
मुंबई मनपाने तयार केलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला निवडणूक आयोगाने प्राथमिक मंजुरी देण्यात दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये २२७ ऐवजी आता २३६ वॉर्ड असतील. आता या संदर्भातील प्रारुप आराखडा कसा असेल, आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे.