मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून आता ‘मंत्री तुमच्या दारी’ अभियान

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. राज्यात भाजपला साथ देत शिंदे गटानं सत्ता स्थापन केली. आता भाजप आणि शिंदे गटानं मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.

भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या वतीनं शिवसेनेवर सातत्यानं टीकास्त्र सोडली जात आहेत. अशातच शिवसेनेकडूनही महापालिकेवर सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावेळी भाजपनं ‘मिशन मुंबई’चा श्रीगणेशा केला. तेव्हापासूनच मुंबई काबीज करण्यासाठी भाजपकडून सातत्यानं अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी करणाऱ्या भाजपनं आता मुंबईत आणखी एक अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. भाजपनं ‘मंत्री तुमच्या दारी’ अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानामध्ये मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा मुंबईतील सर्व वॉर्डात जनता दरबार घेणार आहेत. मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपनं हा नवा फॉर्म्युला राबण्याचं जाहीर केलं आहे. मुंबई आणि उपनगरतील सर्व महापालिका वॉर्डात मंगलप्रभात लोढा जनता दरबार घेणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकींच्या तोंडावर थेट जनतेशी जुळवून घेण्यासाठी भाजपनं हा नवा फॉर्म्युला राबण्याची योजना आखलं आहे.

Team Global News Marathi: